गाडगे बाबांचे बालपण

आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.

डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा

  • १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी गावकऱ्यांना शिकविला होता. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही.

  • कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगे बाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

  • समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

  • महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगे बाबांच्या कार्यामुळे ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

  • भुकेलेल्यांना : अन्न

  • तहानलेल्यांना : पाणी

  • उघड्यानागड्यांना : वस्त्र

  • गरीब मुलामुलींना : शिक्षणासाठी मदत

  • बेघरांना : आसरा

  • अंध, पंगू रोगी यांना : औषधोपचार

  • बेकारांना : रोजगार

  • पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय

  • गरीब तरुण-तरुणींचे : लग्न

  • दुःखी व निराशांना : हिंमत

  • गोरगरिबांना : शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे !

हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संत गाडगे बाबांचा संक्षिप्त जीवनपट

  • १८७६ - १९१७

    २३ फेब्रुवारी १८७६ जन्म.

    १८८४ - वडील झिंगराजी यांचा कोतेगाव येथे मृत्यू .

    १८८४ – वडिलांच्या मृत्युनंतर दापुरे येथे मामाच्या घरी वास्तव्य.

    १८९२ - डेबुजीचे लग्न झाले. कमलापूर तरोडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या कुंताबाई यांच्याशी डेबुजीचा विवाह.

    १८९९ – प्रथम कन्या आलोकाबाईचा जन्म, गाव दापुरे.

    १९०० – द्वितीय कन्या कलावतीबाईचा जन्म, दापुरे.

    १९०२ – पुत्र मुदगलचा जन्म, दापुरे.

    १९०४ – श्री सदगुरू भेट.

    १ फेब्रुवारी १९०५ रोजी सकाळी ३.०० वाजता गृहत्याग.

    १९०५ – पुत्र गोविंदाचा जन्म, दापुरे.

    १९०६ – गोरक्षण संस्था, मुर्तीजापुर, स्थापना.

    १९०७ – ऋणमोचन यात्रा, नामसप्ताह व भंडारा करण्यास सुरुवात.

    १९०८ - पूर्णा नदीवर घाट बांधून तयार झाला.

    १९१४ – ऋणमोचनला पत्र्याची परीट धर्मशाळा बांधली.

    १९१७ - पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.

  • १९१९ - १९३५

    १९१९ – चिरंजीव गोविंदाचे लग्न, वरळी, मुंबई.

    १९२० – पंढरपूर येथे मराठा धर्मशाळा बांधली.

    १९२१ – अंध पंगू सदावर्त पंढरपूर येथेउघडले.

    १ मे १९२३ - आई सखुबाई यांचे निधन.

    ५ मे १९२३ - एकुलता एक पुत्र गोविंदाचे निधन.

    १९२५ - पंढरपूर येथे परीट धर्मशाळा बांधली.

    १९२६ - कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात भेट.

    १९३० – नाशिक धर्मशाळा ट्रस्ट स्थापन.

    १९३० – आळंदी धर्मशाळा ट्रस्ट स्थापन.

    १९३० – आळंदी येथे परीट धर्मशाळेची स्थापना.

    १९३० – देहू येथे धर्मशाळेची स्थापना.

    १९३० – हिंसाबंदी कार्यक्रमास सुरूवात.

    १९३१ - वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

    १९३१ – दोन घाट बांधले.

    १९३२ – अंध पंगू सदावर्त नाशिक येथे सुरु केले.

    १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.

    २७ नोव्हेंबर १९३५ - वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगेबाबांची पहिली भेट.

  • १९३७ - १९५६

    १९३७ – काटेपूर्णा नदीवर दोन घाट बांधले.

    १९४० – पुणे येथे धर्मशाळेची स्थापना

    १९४० – त्र्यंबकेश्वर येथे परीट धर्मशाळेची स्थापना.

    १९४८ – त्र्यंबकेश्वर येथे कलईवाला धर्मशाळेची स्थापना.

    १४ जुलै १९४९ रोजी स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या 'संत चोखामेळा धर्मशाळे'ची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.

    १९५२ – श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईची स्थापना

    १९५२ – नागरवाडी येथील गोरक्षण संस्थेची स्थापना

    १९५२ - पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेतील अस्पृश्यता निर्मूलन यासंदर्भात कठोर भूमिका मांडून दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा असे कळकळीचे आवाहन या किर्तन परिषदेतून त्यांनी केले होते.

    गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.

    १९५३ – राहुरी येथे श्री गाडगे महाराज गोरक्षणची स्थापना.

    १९५४ – मुंबई येथील जे.जे.हॉस्पिटल कंपाउंड येथे धर्मशाळेची स्थापना.

    ९ ऑगस्ट १९५४ – श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, राहुरीची स्थापना.

    ८ नोव्हेंबर १९५६ - रोजी संत गाडगे महाराजांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन चित्रित करण्यात आले आहे. त्यांच्या हयातीतील त्यांच्या आवाजात असलेले मूळ ध्वनी मुद्रित करण्यात आलेले एकमेव किर्तन असल्यामुळे याद्वारे आपणाला त्यांचे स्पष्ट व परखड विचार ऐकण्यास मिळतात व गाडगेबाबा समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यास आपणाला फार मोठी मदत होते.

    २० डिसेंबर १९५६ - गाडगे बाबांचे वलगाव येथील पेढी नदीवर निर्वाण.

विशेष भेटीगाठी

  • गाडगेबाबा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    १४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदस्वामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदस्वामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

  • गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील

    गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचं होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पूढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी, पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. याच जागेवर 500 लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सदगुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांचे अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.

    कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.

  • महात्मा गांधी व गाडगेबाबा

    महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते, असे आपल्याला त्यांच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून दिसते. २७ नोव्हेंबर १९३५ रोजी वर्धा येथे गाडगे बाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर १९३६ मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी कायम त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल सहा ते आठ तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झालेली होती. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाव मोहीम, इ. याबाबत आपल्या कीर्तनातून गाडगे बाबा लोकांना गांधीजीं व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे.

गाडगे महाराजांची प्रकाशित पुस्तके

  • असे होते गाडगेबाबा ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • ओळख गाडगेबाबांची ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • कर्मयोगी गाडगे बाबा ( मनोज तायडे )
  • गाडगेबाबा ( चरित्र, प्रबोधनकार ठाकरे )
  • गाडगे बाबांचा पदस्पर्श ( केशव बा. वसेकर )
  • श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन ( गो.नी. दांडेकर )
  • Shri Gadge Maharaj ( इंग्रजी, गो.नी. दांडेकर )
  • प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत-गाडगेबाबा ( संतोष अरसोड )
  • गाडगेबाबांच्या सहवासात ( जुगलकिशोर राठी )
  • गाडगे माहात्म्य ( काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले )
  • गोष्टीरूप गाडगेबाबा ( विजया ब्राम्हणकर )
  • निवडक गाडगेबाबा ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • मुलांचे गाडगेबाबा ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • लोकशिक्षक गाडगेबाबा ( रामचंद्र देखणे )
  • लोकशिक्षणाचे शिल्पकार ( रा.तु. भगत )
  • लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य ( डॉ. द.ता. भोसले )
  • The Wandering Saint ( इंग्रजी, वसंत शिरवाडकर )
  • संत गाडगेबाबा ( गिरिजा कीर ) )
  • संत गाडगेबाबा ( दिलीप सुरवाडे )
  • संत गाडगेबाबा ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • Sant Gadagebaba ( इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत )
  • संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • श्रीसंत गाडगे महाराज ( मधुकर केचे )
  • श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र ( पां.बा. कवडे, पंढरपूर )
  • संत श्री गाडगे महाराज ( डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर )
  • गाडगे महाराजांच्या गोष्टी ( सुबोध मुजुमदार )
  • समतासूर्य गाडगेबाबा ( प्रा चार्य रा.तु. भगत )
  • स्वच्छता संत गाडगेबाबा ( प्राचार्य रा.तु. भगत )
  • संत गाडगे महाराज काल आणि कर्तृत्व ( सत्यवान मेश्राम )
  • निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज ( उद्धव रसाळे )
  • संत गाडगे बाबा व्यक्ती आणि कार्य ( डॉ.उषा वेरुळकर )
  • माणुसकीचा नंदादीप श्री संत गाडगे बाबा ( संभाजीराव पाटणे )
  • सेवायोगी संत गाडगे बाबा ( प्रा.र.न.महाजन )
  • तोची साधू ओळखावा ( प. ह.पाटील )
  • दीनांचा कैवारी ( प.ह.पाटील )
  • संत गाडगे बाबांच्या सान्निध्यात ( गुणवंतराव च-हाटे )
  • साधू भले न मानो ( हिंदी, वसंत पोतदार )
  • श्री संत गाडगे बाबा विचारधन ( हिंदी, प्रा.सुनंदा पाठक )
  • श्री गाडगे बाबा ( त्रैमासिक, ओंकारनाथ जोशी )
  • श्री गाडगे बाबा ( त्रैमासिक, तुकाराम खांडवे )
  • गाडगे बाबांच्या गोष्टी ( राजा मंगळवेढेकर )
  • कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांची ओळख ( भिकाजी गणेश भोसले )
  • श्री गाडगे बाबा आणि अंधश्रद्धा ( आपासाहेब वाघमारे )
  • मराठी माणसे मराठी मने ( प्रल्हाद केशव अत्रे )
  • श्री संत गाडगे बाबा चरित्र दर्शन ( लक्ष्मण पापळकर )
  • जनता जनार्दन – दिवाळी अंक दुसरा ( संपादक अच्युतराव गुलाबराव देशमुख )
  • लोकोत्तर युगपुरुष – संत गाडगे बाबा ( श्रीनिवास भालेराव )
  • भक्तीसंगम ( संपादक सुधाकर सामंत )
  • श्री गाडगे बाबा ( संपादक उ.अ.देशमुख )
  • श्री गाडगे महाराज साहित्य पत्रिका ( संपादक गजानन देशमुख )