Thumb
26th March

स्नेह मेळावा माजी विद्यार्थी मनोगत

वाढत चाललेली गुन्हेगारी व व्यसनाधीनता बघता शालेय शिस्तीला किती महत्त्व आहे हे प्रत्येकाच्या मनात जागृत झाल्याशिवाय राहत नाही. श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलातील शिस्त आज आपल्या जीवनात किती महत्त्वाची ठरत आहे याची कल्पना अनेकांना आल्याशिवाय राहत नाही. आपली माजी विद्यार्थिनी वर्षा पाटील ( गुंजाळ ) यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगून जातात.... _______________________________________________ मी वर्षा पाटील (गुंजाळ) दहावी बॅच 1987. मैत्रीचं नातं आणि शाळेची ओढ, किती अतूट असते, हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. गाडगे महाराज विद्यालय... नुसतं नाव उच्चारलं तरी मनात अनेक भावनांचा कल्लोळ उमटतो. मी शाळेच्या 1987 च्या बॅचच्या विद्यार्थिनी. त्याला आता 35 वर्षे झाली, इतका प्रदीर्घ कालावधी उलटल्यानंतरही तेव्हाची, शाळेची ती आपुलकी, ती ओढ अजूनही कायम आहे. माझ्या शाळेने मला काय दिले? प्रेम दिले, आपुलकी दिली, शिस्त शिकवली, कलागुणांना वाव दिला, आत्मविश्वास दिला, सकारात्मक दृष्टिकोन दिला, जो पुढील आयुष्यात माणूस म्हणून जगण्यात, व्यवसायात, करिअरमध्ये सतत उपयोगी पडत आहे. शाळेत आम्हाला उत्तमोत्तम गुरुजन लाभले. मोरे सरांची इंग्लिश शिकवण्याची हातोटी आणि आम्ही काहीतरी चांगले शिकावे याची तळमळ. मेहेर सर यांचे सुरेख अक्षर आणि आश्वासक हास्य. गंवादे मॅम, ताजणे मॅम, हुलावडे मॅम, तांबे मॅम, यांचे लहान मुलांना शिकवण्याचे कौशल्य. कचाटे सर, शिंगोटे सर, कातोरे सर, यांचे पाठ्यपुस्तकासोबत इतर गोष्टीचे उकलून सांगितलेले ज्ञान. सहाणे सर, भागवत सर, सातपुते सर, यांचे गणित, विज्ञान शिकवण्याचे कसब, देशमुख सर, फापाळे सर, घोलप सर, कोल्हे सर... कितीतरी आठवणी आज इतक्या वर्षानंतर ही ताज्या आहेत. या गुरुजनांनी संस्कार दिले, शिस्तीचे महत्व शिकवले, वेळ प्रसंगी कठोर उपाययोजना ही केल्या, पण त्यातूनच आमचे व्यक्तिमत्व घडले. त्यावेळी त्या वयाला त्याचे महत्त्व कळत नव्हते, पण पुढे आयुष्यात विविध क्षेत्रात काम करताना, विविध प्रसंग हाताळताना, विविध चॅलेंज स्वीकारताना, ते कायम जाणवत आहे. त्यामुळे एखादा माणूस जसा आता आहे, तसा त्याला घडविण्यात, जिथे त्याने, आपल्या आयुष्याची अनेक वर्षे घालवली, त्या शाळेचा खूप मोठा वाटा असतो. आणि आज खरोखरच मी ज्या प्रकारे वागते, बोलते, विचार करते,शिकते, माझी मते मांडते, यामध्ये मला माझ्या शाळेनी दिलेल्या संस्काराचीच शिदोरी आहे. कुठलीही शाळा म्हणजे फक्त शाळेची इमारत नाही, वह्या पुस्तकं नाहीत, अभ्यास, परीक्षा, मार्क्स नाहीत. शाळा या सर्व गोष्टीपेक्षा नक्कीच मोठी आहे. शाळा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक आधार देते, आकार देते, आणि असंख्य वेगवेगळ्या अनुभवांनी तुमचं आयुष्य समृद्ध करते. माझ्या शाळेने ही मला असेच वेगवेगळे अनुभव दिले, जीवनाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला, आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे सामाजिक भान... आणि हे सामाजिक भान लक्षात ठेवून आमच्या 1987 च्या बॅच कडून नक्कीच शाळेच्या नवीन वास्तूसाठी हातभार लागेल. आत्तापर्यंतच्या मुलांचे करियरचे क्षेत्र वेगळे होते. तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च पदापर्यंत पोहोचून आपला ठसा उमटविला आहे. क्रीडा क्षेत्र, अवकाश क्षेत्र, कॉम्प्युटर मधील ए आय, भूगर्भशास्त्र, सैनिकी क्षेत्र, यामध्येही आपल्या शाळेतील मुले पुढे गेली पाहिजेत. शाळेच्या नवीन मॉडेल मध्ये उपलब्ध असलेल्या सोयी, सुविधा नक्कीच या पिढीला मिळतील, आणि असे कुठलेही क्षेत्र उरणार नाही की, जिथे गाडगे महाराज विद्यालयाचा विद्यार्थी नसेल. शाळा कॉलेजचे दिवस संपले की, प्रत्येक जण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो, मात्र ज्या शाळेत आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, त्या शाळेतील वेगवेगळ्या स्वभावाच्या विद्यार्थ्यांबरोबर, मैत्रीचे जे नाते जोडले, ते बंध मात्र तसेच असतात. एकमेकांबद्दल असलेला आदर, प्रेम तसूभरही कमी झालेला नसतो. कालच्या महामेळाव्या पेक्षा सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे,आमचा बॅचला आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मिळालेले निमंत्रण. या कार्यक्रमासाठीचे अध्यक्ष पद डॉ. मिलिंद सानप यांनी भूषविले व आम्ही सर्व 1987 च्या बॅचचे माजी विद्यार्थी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो होतो. स्नेहसंमेलनाच्या दिवशी पुन्हा एकदा आमचा वर्ग भरला. ज्या बेंचवर बसून शिक्षण घेतलं, त्यावर पुन्हा बसताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. जुन्या आठवणीने मन अगदी भरून आले होते. आमच्या या सर्व मित्रांना उदंड आयुष्य लाभो व आमची ही अतूट मैत्री अशीच बहरत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

gmvotur Read More
Thumb
5th March

प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ

प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ प्राध्यापक डॉ.विलास गणपत पोळ यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फडकावला! प्राध्यापक पोळ यांनी आवर्तसारणीमधील (ऊर्फ पिरिऑडिक टेबल) सर्व मूलभूत रासायनिक घटकांची मांडणी जागतिक पातळीवर विक्रमी वेळेत केली. विलास पोळ पर्ड्यू विद्यापीठ (इंडियाना- अमेरिका) येथे केमिकल इंजिनीयरिंग विभागात प्राध्यापकी करतात. शिवाय, ते भारतात इंदूरच्या आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि आयआयटीच्या पदवीच्या व पदव्युत्तर काही विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांची पत्नी डॉ. स्वाती पोळ यादेखील पर्ड्यू विद्यापीठात शास्त्रज्ञ या पदावर काम करत असून, त्यांनी गेली चार-पाच वर्षें गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची पुस्तके त्यांच्या मुलांना आणि पती विलास यांना भेट दिली. त्या उपक्रमातून विलास यांना आणि त्या दांपत्याच्या मुलांनाही ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या कथा वाचण्याची प्रेरणा मिळाली. विलास यांनी त्यांच्या मुलांबरोबर ती पुस्तके वाचली आणि रसायनशास्त्र व केमिकल इंजिनीयरिंग क्षेत्रात नवीन ‘करिष्मा’ करण्याचा निर्णय घेतला, उद्देश हा, की त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आणि जागतिक समुदायाला प्रेरणा मिळावी! विलास पोळ यांनी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तून रसायनशास्त्रात एम एससी, एम फिल आणि इस्रायलमधील बार-इलान विद्यापीठातून पीएच डी पदवी मिळवली आहे. ते स्वत: रसायनशास्त्रज्ञ असल्याने, त्यांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर- ‘मॉडर्न पिरिऑडिक टेबल’मधील घटकांच्या मांडणीवर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी तयारी करण्याचे ठरवले. मग त्यांनी संपूर्ण आधुनिक पिरिऑडिक टेबल आणि घटक यांचे गुणधर्म नीट लक्षात ठेवले. विलास यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यावर त्यांना त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु व्यवस्थापनाला तो विक्रम करण्यासाठी विशिष्ट पद्धत हवी होती. ती म्हणजे 2 इंच x 2 इंच आकाराच्या प्रत्येक सिरॅमिक टाइलवर पिरिऑडिक टेबलमधील घटकांची चिन्हे लिहून तशा टाइल्सचा एक ढीग करावा. त्यानंतर, पिरिऑडिक टेबलची कोणतीही बाह्यरेषा दिलेली नसताना, त्या ढिगातील सिरॅमिक टाइल्स योग्य रीतीने मांडाव्यात आणि ती मांडणी कोठल्याही दोन टाइल्समधे अंतर अथवा फट न ठेवता करावी. ते आव्हान निश्चितच अवघड होते! विलास पोळ यांनी त्या पद्धतीने पिरिऑडिक टेबलमधील घटकांच्या मांडणीचा अभ्यासपूर्ण सराव तीन आठवडे केला आणि 15 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी एका मोठ्या टेबलवर पिरिऑडिक टेबलच्या सर्व घटकांची मांडणी अचूक करून त्यासाठी आठ मिनिटे आणि छत्तीस सेकंदांचे आजवरचे सर्वाधिक कमी वेळाचे नवीन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित केले. ‘सध्याचे विद्यार्थी व नवीन पिढी यांना पिरिऑडिक टेबल अगदी व्यवस्थितपणे पाठ असावेत. कारण ते नवीन वैज्ञानिक संशोधनांचा पाया आहे असे विलास यांचे मत आहे. मानवी शरीरात पिरिऑडिक टेबलमधील सुमारे तीस घटक असतात, तर सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये सर्व आवश्यक चुंबकीय, ऑप्टिकल व कार्यन्वयन प्रणाली मिळवण्यासाठी पंच्याहत्तर घटक (एकशे अठरा घटकांपैकी) आहेत. हे घटक स्मार्ट फोनमध्ये असल्याने, स्मार्ट फोन मानवापेक्षा हुशार ठरण्यास कारणीभूत आहे असे विलास पोळ सांगतात. पिरिऑडिक टेबल दीडशे वर्षांपूवी दिमित्री मेडेलीव यांनी सर्वप्रथम तयार केले. यंदा पिरिऑडिक टेबलप्रमाणे पर्ड्यू विद्यापीठाचेही दीडशेवे वर्धापनवर्ष साजरे होत आहे. पर्ड्यू विद्यापीठाप्रमाणे, पिरिऑडिक टेबलही दीडशे वर्षांत सातत्याने विकसित होत गेले आहे. त्यात सध्याच्या काळातील शेवटचा एक घटक 2016 साली जोडला गेला. विलास पोळ यांच्या या पहिल्या यशस्वी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नंतर, आता, सामाजिक आवडीशी निगडित एकाद्या नवीन वैज्ञानिक विषयावर ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा विलास पोळ यांचा मानस आहे. डॉ.विलास पोळ हे आपल्या श्री गाडगे महाराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव जगात झळकावले याचा श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल, ओतूरला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा...!

gmvotur Read More
Thumb
25th February

स्नेह मेळावा

Shri Gadge Maharaj Educational Campus, Otur

gmvotur Read More
Thumb
25th February

स्नेह मेळावा

स्नेह मेळावा झाल्यानंतर अनेक उपस्थितांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींना तर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं अवघड जात होतं, म्हणून त्यांच्या डोळ्यांच्या कडा काहीशा नकळत ओलावल्या होत्या. अनेकांना आपल्या शब्दांना आवर घालताही येत नव्हता. सदर मेळाव्यास काहींची इच्छा असूनही कामात व्यस्त असल्याने येता न आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. त्यातीलच एक खाली देत आहोत.... खरं तर खाली दिलेली प्रतिक्रिया म्हणजे श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलाचे दिसून न येणारे यश आहे. वै. प्र. मा. पाटील साहेब यांनी वसतिगृह सुविधा उपलब्ध केल्याने, कित्येक विद्यार्थ्यांचे कल्याण झाले असेल ही बाब शब्दात व्यक्त करण्यासारखी नक्कीच नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात राहून आपल्या आयुष्याचे स्वप्न साकार केले त्यांच्यासाठी याचे मोल किती असेल याचा विचार होणे महत्त्वपूर्ण आहे. ऋणानुबंध म्हणजे काय आणि तो कसा जपला पाहिजे याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे. ही ऊर्जा आपल्या माजी विद्यार्थ्यांत या स्नेहमेळाव्यातून निर्माण होण्यास मदत झाली हे मात्र नक्की _______________________________________________ सर, काल झालेल्या स्नेह मेळाव्याला काही अपरिहार्य कारणामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर राहील. खंत यासाठी आहे कि असा हा दुर्मिळ योग जीवनामध्ये फार कमी वेळेस येतो. उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल शाळेची, सर्व शिक्षक व्रृंदाची, संचालकांची, विद्यार्थ्यांची व पूर्ण संकुलाची मी क्षमा मागतो. दिलगिरी व्यक्त करतो. परंतु वैयक्तिक माझ्यासाठी माझ्या शाळेने संस्थेने मला कुठलाही आदेश द्यावा, तो मी सिरसावंद्य मानुन पुर्ण करेल याची मी ग्वाही देतो आणि संस्थेच्या आदेशाची वाट पाहतो (नविन शाळा संकुल बांधकाम). कालचा दिवस खरंतर फार अस्वस्थतेत गेला कारण हा दुर्मिळ योग परत केव्हा येईल हे नक्की नाही. परत एकदा माझ्या संस्थेची संकुलाची माफी मागतो आणि पुढील आदेशाची वाट पाहतो. संत गाडगे बाबांच्या चरणांशी शतशः नमन. दादांचा वारसा पुढे नेण्यास व आपले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आपणा सोबत आहोत. आपलाच, दत्तात्रय राधुजी मनसुक. 1988 दहावी बॅचचा वसतिगृहातील विद्यार्थी

gmvotur Read More
Thumb
25th February

शाळेच्या आठवणी

श्री गाडगे महाराज शिक्षण संकुलातील अनेक विद्यार्थी आता आपल्या आठवणी मांडू लागलेत. यातून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. भूतकाळातील आठवणी वाचून, ऐकून अनेकांच्या मनावर एक वेगळे चैतन्य निर्माण होत आहे. आपले माजी विद्यार्थी Sunil Vaidya यांची एक पोस्ट तत्कालीन शाळेच्या मौलिक पैलूंवर भाष्य करत आहे.... नक्की वाचा..... _______________________________________________ श्री गाडगे महाराज विद्यालयात आम्ही जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळची शाळा आजुनही नजरेसमोर आहे..जिल्हा परिषदेच्या शाळेतुन जेव्हा ह्या मोठ्या शाळेत आलो त्यावेळी ह्या शाळेच्या मोठमोठ्या इमारती पाहुन, मुलांची संख्या पाहुन जिव दडपुन गेला होता... सगळं वातावरण नवखं वाटत होतं...प्रवेश घेऊन जेव्हा वर्गात प्रवेश केला त्यावेळी बेंचवर बसायला मिळणार ह्याचं कुतुहल होतं...त्यावेळी बेंचवर बसलो तर पाय जमिनीवर टेकत नव्हते...पायाला रग लागायची.. एकेका बेंचवर तिन तिन मुले बसायची...ही शाळा त्यावेळी इतकी फॉर्म मधे होती.. एकेका तुकडीत साठ साठ मुलं असायची.. वर्ग गच्च भरलेला.. प्रत्येक विषय शिकवायला वेगळे सर असायचे.... मराठी शाळेत शिक्षकांना गुरुजी म्हणायचो. पण हायस्कूल मधे शिक्षकांना सर म्हणावे लागे....त्यावेळचे सगळे शिक्षक अत्यंत शिस्तप्रिय होते...त्यांचा धाक होता... तेव्हा बहुतेक सगळे शिक्षक गावात सदगुरु भुवन म्हणुन त्यातल्या त्यात चांगली इमारत असल्याने ते ह्याठिकाणी रहायचे.. माझे घर ह्याच आळीत असल्याने कधीही घराचे बाहेर निघालो तर शिक्षक रस्त्यावर भेटायचे... त्यांच्या समोरून जायला भिती वाटत असे.... मनावर सतत दडपण होते... पहीले वर्षे असेच दडपणाखाली गेले त्यानंतर मात्र जरा सरावलो आणि ताजणेबाई, हुलावळेबाई, कातोरे सर, फापाळेसर, मेहेरसर ह्यांचा आवडता विद्यार्थी झालो... ह्या शाळेतील पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी.. त्यावेळची परेड, गावातुन निघणारी प्रभातफेरी आजुनही डोळ्यासमोर आहे...शाळेचे स्नेहसंमेलन त्यावेळची ती दोन तीन दिवस चालणारी धामधूम... शाळेतील खेळाच्या स्पर्धा.. सगळं भारावलेलं होतं...आता ओतुर चारही बाजुने वाढलयं पण तेव्हा ही शाळा गावापासून खुप लांब आहे असं वाटायचं...वेशी बाहेर पडल्यानंतर शाळेकडे जाताना मोठी वड पिंपळाची, कडुलिंबाची झाडं होती.. तर शाळेच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला एक पिंपळाचं झाड होतं..त्याखाली शेंदूर फासलेला दगड होता... शाळेत जाताना ऊशीर झाला तर घाईघाईने ह्या दगडाच्या पाया पडायचं...हे केलं की शिक्षक ओरडणार नाहीत अशी आमची समजुन झाली होती...तसेच परिक्षेला जातांना पेपर सोपा जावा म्हणुन ह्याच पिंपळाच्या झाडाची हाताच्या करंगळीने साल काढायची...ती निघाली की पेपर सोपा जाणार ही एक भाबडी समजून होती...गंमत अशी की, मुलांनी ह्या झाडाची साल काढुन ते गुळगुळीत केलं होतं. शाळा लांब असल्याने शाळेत डबा घेऊन जावं लागत होतं...आम्ही मित्र मधल्या सुट्टीत तुकाराम महाराजांच्या मंदीरा समोर एक लहान समाधी मंदिर आहे ...त्याचे कट्ट्यावर बसुन डबे खायचो...ते मंदिर आजुन त्याठिकाणी आहे....ह्या शाळेच्या अनेक आठवणी आहेत... कुणीतरी म्हटलयं..."तुम्ही गाव सोडुन नोकरी धंद्यासाठी निघुन जाल..पण तुमच्या मनातले शाळेचे दिवस,शाळा कधीच दुर जाणार नाहीत..."..ह्या शाळेने मला काय दिलं...तर मी म्हणेल..ह्या शाळेने मला चांगले शिक्षक दिले...चांगले मित्र दिले...जगायचं कसं हे ह्या शाळेने शिकवलं...ह्या शाळेने भविष्याचा मार्ग दाखवला...जग दाखवलं...कसं बोलावं कसं वागावं हे शिकवलं...ह्या शाळेने जिवनाचा मार्ग दाखवला... ह्याच शाळेने भविष्य घडवलं....अशी ही माझी शाळा...गाडगे महाराज विद्यालय ओतुर... .... सुनील वैद्य....

gmvotur Read More
Thumb
28th February

Science Day

श्री गाडगे महाराज इंग्लिश मिडीयम विद्यामंदिर ओतूर येथे विज्ञान दिन प्रत्यक्ष विज्ञान प्रतिकृती साकारून साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुध्दीचा वापर करून विविध प्रयोग व प्रतिकृती सादर केल्या.

gmvotur Read More
Thumb
25th February

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

नमस्कार मंडळी, आज मी तुम्हांला घेऊन जाणार आहे…आठवणींच्या दुनियेत. जगुयात पुन्हा एकदा बालपणात! शिक्षकांच्या छड्या खाऊन मोठे झालेले, छड्या चुकवून मोठे झालेले आणि छड्या खाऊन स्वतः चं आयुष्य बदललेल्या सर्वच मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी घेण्याचा योग आलाय. काय मग, एव्हाना लक्षात आलंच असेल ना तुमच्या! तर मंडळी, आज आपण भेटणार आहोत आपल्या शालेय जडणघडणीतील महत्वाच्या प्रत्येक व्यक्तीला. कुणाला आठवणीत आठवून तर कुणाला डोळे भरून पाहणार आहोत. आज पोहोचलोय आपण ओतूर नगरीतील श्री. गाडगे महाराज विद्यालय ओतूर या ठिकाणी. निमित्त आहे स्नेहमेळाव्याचं, तेही अगदी 1960 सालापासून ते सन 2023 पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे. काय मग, शॉक झालात ना! असा आगळा वेगळा स्नेहमेळावा अनुभवलाय का कधी? नाही ना? तर मग, आपल्या Swatisoham चॅनेलला संपूर्ण video upload केला आहे. नक्की पहा आणि जगा या स्नेहमेळाव्यात. शाळेच्या वतीने ना सुंदर स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांचे स्वागत मात्र भलत्याच प्रकारे केलं गेलं. बघा बघा, सर कशा छड्या देताहेत विध्यार्थ्यांना! आणि विध्यार्थी पण हसऱ्या चेहऱ्याने छड्या घेताहेत. जरा जगवेगळीच ही आजची शाळा भरलीय. जरा आठवून बघा बरं, शाळेत असताना एवढ्या आनंदाने कुणी छड्या खाल्ल्या होत्या! आणि खाल्याच असतील तर मला कंमेंट करून नक्कीच सांगा बरं! आणि हो सांगायचंच राहिलं, छडीबरोबर तिळाचा लाडुही सरांनी भरवला. म्हणजेच काय तर, शिस्तही आम्हीच लावणार आणि मायाही आम्हीच करणार असं जणू या सर्व शिक्षकांना सांगायचं होतं. यानंतर, आलेल्या सर्व विदयार्थ्यांचं पुष्पसुमने उधळून स्वागत करण्यात आले. याच बरोबरीला व्यासपीठावरून शब्दसु्मनांची उधळण करत स्वागत करत होते विद्यालयाचे माजी विध्यार्थी संजय गवांदे. काय तो स्वागतसोहळा, सगळे अगदी भारावून गेले होते. त्याकाळी, शिक्षकांना घाबरणारे माजी विध्यार्थी आजही त्याच आदराने शिक्षकांकडे पहात होते. आणि तेव्हा येवढु येवढुशी असणारी पोरं आज मोठमोठे साहेब बियेब होऊन समोर बसलीत हे बघून शिक्षकही भारावून गेले होते, भावुक झाले होते. मनोमन म्हणत होते, आपण घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. काय तो सोहळा वर्णावा या स्नेहमेळाव्याचा! यानंतर, विद्यालयाचे माजी विदयार्थी आणि पहिल्या बॅचचे, पहिले विद्यार्थी असे मानांकन पटकावलेले जयसिंग अस्वार यांनी यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून शाळा भरवण्यात आली. इकडं तिकडं फिरत बसणारी पोरं- पोरी पटकन जागेवर येऊन बसली, तेही अगदी शिस्तीत! कातोरे सरांनी सूचना देत राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि महाराष्ट्र गीत घेतले. आजही सर्वांना राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा सर्वांना तोंडपाठ होती. त्यानंतर स्वागतगीत, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. स्वागतसोहळा पार पडताच या विद्यालयाला ज्या दिवंगत थोरा - मोठ्यांचे योगदान लाभले त्यांचा परिचय विद्यालयाचे शिक्षक अहिनवे सर आणि शोभा तांबे मॅडम यांनी करून दिला आणि सर्वांनी आदरांजली वाहिली. यानंतर, सर्व माजी शिक्षकांचा मोठ्या मानाने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कातोरे सर तर एवढे भावुक झाले की त्यांना शब्दच फुटत नव्हते. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची यापेक्षा वेगळी अवस्था ती काय असणार! नजर जरा स्टेजवर गेली तर पाहिलं, घुले मॅडमच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यातच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून एका टवराट पोराचा आवाज आला, कातोरे सर आज पाठीत धपाटा नका देऊ. त्याला लगेच दुसऱ्या जरा शहाण्या पोराने आवाज टाकला, या धपाट्यानेच शिस्त लागली सर आम्हाला, आजही धपाटा मिळाला तरी चालेल. आणि भावुक झालेलं वातावरण थोडं हलकंफुलकं झालं. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर ही पोरंसोरं थोडीचं ऐकणार होती! याच शिक्षकांनी घडवलेले ते कोहिनुर हिरे म्हटल्यावर भलीमोठी यादी यांचीही आलीच मनोगत व्यक्त करायला! सर्वांनाच आठवणी सांगायच्या होत्या. परंतु, वेळेअभावी ते काही शक्य नव्हतं. तरी, काही खोडसाळ पोरं पोरी लाईन लावूनच थांबले होते. म्हणजेच काय तर, नियमबाह्य काम शिस्तीत केल्यासारखं! काय तर म्हणे, मला पण बोलायचंय. आठवा जरा मेंदूला ताण देऊन, शाळेत असताना होती का येवढी डेरिंग स्टेजवर बोलायची! आणि असेच हे अनमोल हिरे घडवले होते गाडगे महाराज विद्यालयाने. यामध्ये विद्यालयाचे माजी विद्यार्थी रमेश डुंबरे यांनी छान संकल्पना मांडली, ती म्हणजे शाळा नूतनीकरणाची! खर्चाचा अंदाज देऊन स्वतः ची मदत लगेच जाहीर केली. आणि मित्र परिवाराला मदतीचं आवाहन केलं. आगळंवेगळं रूप शाळेला देण्याचा सर्वांचा मानस यावेळी प्रकर्षाने दिसून आला. येणाऱ्या पिढीसाठी आधुनिक गोष्टी या शाळेच्या माध्यमातून सहज शक्य होईल, म्हणून आले सगळेच पुढे. आणि खरंतर, ज्यावेळी या शाळेचं नूतनीकरण पूर्ण होईल त्यावेळी सर्वांचेच डोळे दिपतील असं प्रेझेंटेशन राजलक्ष्मी मॅडम यांनी लागलीच दिलं. सर्वजण अवाक होऊन पाहतच राहिले. काहींना तर हा माझा वर्ग, हा माझा बेंच या आठवणी वेड लावत होत्या. आणि तेच दिवस आठवून बसल्या की वर्गात! मग मी पण जरा शिस्तीतच वर्ग भरवला. घेऊ म्हटलं यांना जरा रिंगणात! पण, अंगठे धरायची वेळ काय कुणावर आली नाही कारण जीवन जगण्याच्या प्रवासात या तर अजूनच हुशार झाल्यात. यानंतर, सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. कारण, वेळ झाली होती दुपारच्या जेवणाची!जेवणाचा बेत येवढा भारी होता ना, की काय सांगायचंय!चक्क मासवडीचं जेवण, आहाहा! जरा फेरफटका मारला तर चुलीच्या आहारावर भाकरी भाजत होत्या. गावभर मासवड्या, खंडीभर रस्सा आमचीच वाट पहात होता. हळुच बुंदीबाई डोकावून पहात होती. आणि म्हणत होती, पोरींनो मला विसराल गं. तिला धीर देत म्हटलं नाही गं बाई, तुला विसरून कसं चालेल! मासवडीचा झटका शांत करायला शेवटी मोर्चा तुझ्याकडेच वळणार ना! मग काय, खुदकन हसली! आणि आम्ही जेवणावर यथेच्छ ताव मारला. आता वेळ झाली होती निरोप घेण्याची. छान, सुंदर सोहळा पार पडला आणि या गोड आठवणींचं गाठोडं घेऊन निघाले पुन्हा अशाच स्नेहमेळाव्याची वाट पहात. भेटूयात पुन्हा लवकरच.

gmvotur Read More